२१ सप्टेंबर रोजी सकल ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा, मोर्च्याच्या पूर्व तयारी करीता सडक अर्जुनीत येथे बैठक संपन्न.

सडक अर्जुनी : मराठा समाजाची ओबीसीमध्ये घुसखोरी थांबविण्यासह राज्य शासनाने काढलेला शंकास्पद शासन आदेश तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने २१ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनीच्या वतीने दिनांक १६ सप्टेंबर रोजी तेजस्विनी लॉन येथे भव्य सभा घेण्यात आली.

या सभेत सकल ओबीसी समाज संघटना, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ तसेच एस.सी. – एस.टी. समाज संघटना सहभागी झाल्या. मोर्च्याच्या नियोजनासोबतच समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

सभेचे आयोजन ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्षस्थानी माधव तरोने तर प्रमुख उपस्थितीत भूमेश्वर शेन्डे (प्रदेश संघटन), तुकाराम राणे (सदस्य), जिल्हा उपाध्यक्ष अशोक लंजे, महिला अध्यक्ष पुष्पाताई खोटेले व रंजूताई भोई, पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अविनाश काशिवार, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार व भूमेश्वर पटले, मंजूताई डोंगरवार, सरपंच प्रतिभाताई भेंडारकर, सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच मधुसुदन दोनोडे, माजी सरपंच दिनेश कोरे व सरिता तरोने, राजू पटले, राजेश कठाने, जितेंद्र शाहारे, अनिल बावणे, हरीश कोहळे, बबलु मारवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

या प्रसंगी खालील ठराव संमत करण्यात आले : दिनांक २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजीचा शासनादेश (GR) त्वरित परत घ्यावा., ओबीसीसह सर्व समाजाची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी., रब्बी हंगाम २०२५ मधील शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत केंद्रावर विकलेल्या धानाचा मोबदला तत्काळ अदा करावा., पोलीस, शिक्षणासह सर्व विभागांतील बिंदू नामावलीतील नियमबाह्य त्रुटी दूर करून ओबीसींना न्याय्य हक्काची हमी द्यावी.

या सर्व मागण्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी गोंदियातील जयस्तंभ चौकातून सकल ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.